मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचे म्हंटले होते. मात्र हा निर्णय लांबणीवर पडणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. कारण 26 जानेवारीच्या रात्रीपासून नाईट लाईफ सुरु करण्याचा अजून कोणताही निर्णय झालेली नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाईट लाईफवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले , नाईट लाईफ २६ जानेवारीपासून सुरु होणार कि नाही याबाबत अद्याप निर्णय झाला नाही . नाईट लाईफ सुरु करण्यासाठी तेवढा पोलीस स्टाफ आहे की नाही याची खात्री केल्यानंतरच नाईट लाईफचा निर्णय घेतला जाईल. येत्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होऊन मग निर्णय होणार,’ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे मुंबईतील नाईट लाईफबाबत नक्की काय निर्णय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यावेळी पुढे बोलताना मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. मुंबईत पोलिसांकडे याआधी अश्वदल होतं. १९३२ मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता तब्बल ८८ वर्षांनी हे युनिट सुरु होणार आहे. मुंबई पोलिसांच्या या अश्वदलामध्ये ३० घोडे असणार आहेत. पेट्रोलिंग, ट्राफिकसाठी या दलाचा वापर केला जाणार आहे. २६ जानेवारीपासून हे युनिट सुरू होणार आहे. बृहन्मुंबई माउंटेड पोलीस युनिट १ सब इन्सपेक्टर, १ एएसआय, ४ हेडकॉन्स्टेबल, ३२ कॉन्स्टेबल असणार आहेत. तसंच जमावावर नियंत्रण करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणे सोपे जाते. हिंसक जमावावर नियंत्रणासाठी अश्वदल महत्त्वाचं आहे, असं गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
सध्या साईबाबा जन्मस्थळावरून ‘शिर्डी आणि पाथरी बाबत जो वाद निर्माण झाला त्यावरून बंद पुकारला आहे. पाथरी आणि शिर्डी ग्रामस्थांना मुंबईला बोलवून किंवा तिथं जाऊन चर्चा करू. साई मंदिरातील दर्शन सुरू आहे. पोलीस यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. शांततेने आंदोलन सुरू आहे,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.CAAबाबत कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं होतं. त्यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ‘कपिल सिब्बल काय बोलले याची माहिती घेतो, मला कल्पना नाही.’ असे गृहमंत्री अमित देशमुख म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफ ची घोषणा
– मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफचा प्रयोग
– हॉटेल्स ,मॉल , दुकाने २४ तास चालू राहणार
– सुरुवातीला काळा घोडा, बी केसी ,नरिमन पॉईंट यथे प्रयोग