मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानसभेच्या निवडणुकीत डावलले गेल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. जनतेने महायुतीला मतदान दिले होते मात्र मुख्यमंत्री पदावर एकमत न झाल्याने महायुतीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. ऐन वेळेवर ज्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी मदत केली त्यांना डावलले नसते तर २५ जागा भाजपच्या नक्कीच जास्त आल्या असत्या अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपली खद खद व्यक्त करून दाखवली. यावेळी खडसे स्पष्टपणे म्हणाले की विनोद तावडे, मी, चंद्रशेखर बावनकुळे अशा व्यक्तींना तिकीट दिले नाही मात्र आम्हाला निवडणुकीत जरी सक्रिय ठेवले असते तरी भाजपच्या २० ते २५ जागा वाढल्या असत्या. भाजप या आधी आमच्याकडे अजित पवारांच्या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे आहेत असे म्हणत होते त्या पुराव्यांचे काय झाले असे विचारले असता, ते पुरावे आम्ही कधीच रद्दीच्या भावात विकले असल्याचा टोला खडसे यांनी पक्षाला लगावला.
ज्यावेळी पक्षाची स्थिती ठीक नव्हती त्यावेळी आम्ही पक्षाची पताका खांद्यावर घेऊन मिरवतो होतो मात्र ऐन वेळी आमच्यावर असा अन्याय का ? असा प्रश्न देखील मी सर्व पक्ष श्रेष्ठींना विचारला असल्याचे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे पहायला मिळाले.
Visit : bahujannama.com