पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी घूमजाव केलं आहे. माझ विधान उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कोणत्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे म्हणत आपल्या विधानाबाबत त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, माझं वाक्य उलटं वाचलं गेलं. मी म्हटलं होतं की, जर उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढवणार आहोत. कारण भाजपच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱ्यावर विजयी व्हायचं नंतर काही तिसरचं हे चालणार नाही, त्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं लढावं. त्यामुळे राज्यात भाजपचं सरकार येणार हा विषयच नव्हता तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सांगितले. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप चार वर्षे आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूने प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल, केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.