नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – मराठी माणूस आणि हिंदुत्व हे शिवसेनेच्या राजकारणाचा प्राण आहे. गेली पाच दशकं याच हिंदुत्वाच्या राजकरणाने शिवसेनेने महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात वादळ निर्माण केलं होतं. ज्वलंत हिंदुत्वाचा एकमेव पक्ष अशी ओळखही शिवसेनेने निर्माण केली. मात्र गेल्या महिनाभरात परिस्थिती बदलली आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. त्यावरून शिवसेनेला मोठी टीकाही सहन करावी लागली. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठी कबुली दिलीय. राजकारण हा जुगार असून तो जुगारासारखाच खेळावा लागतो. त्याची गल्लत केली की गडबड होते. राजकारण आणि धर्म यांची आम्ही सरमिसळ केली आणि त्याचे फटके आम्हाला पडले असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या या कबुलीने शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट होते असं म्हटलं जातंय. शिवसेना आपल्यालाला हिंदुत्वाचा एकमेव तारणहार मानत असताना ठाकरेंनी अशी कबुली देणं हे महत्त्वाचं मानलं जातंय.
नागपूर हिवाळी अधिवेशन संपायला आता फक्त दोन दिवस राहिले आहेत. सगळ्यांना उत्सुकता आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. त्यानंतर महाविकासआघाडीने सांगितल्या प्रमाणे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आता सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी दोन दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अधिवेशनापूर्वी खातेवाटप करण्यात आले. परंतु आता अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.आता नागपूरात सर्व पक्षांच्या या प्रश्नी बैठका सुरु आहेत. शरद पवार देखील नागपूरात दाखल झाले आहेत.
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यात आज बैठक झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरेंना पत्रकरांनी प्रश्न विचारला परंतु त्यांनी उत्तर देणे टाळलं. ठरलं की सांगू असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारावरून सर्वाधिक अस्वस्थता ही राष्ट्रवादीत आहे असं बोललं जातंय. अजित पवारांच्या बंडानंतर असंतुष्ट आमदारांना संतुष्ट करण्यासाठी मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. मंत्रिपद मिळालं नाही तर असंतोष निर्माण होण्याची भीतीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतेय. त्याचबरोबर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार का ? यावरही राष्ट्रवादीला निर्णय घ्यावा लागणार आहे. बंडानंतर अजित पवारांबद्दल एक साशंकता निर्माण झालीय. त्याच बरोबर दादांना पद दिलं नाही तर असंतोष निर्माण होण्याची भीती आहे.
Visit : bahujannama.com