वाशीम : बहुजननामा ऑनलाईन – वाशीम जिल्हा कोरोनामुक्त असताना जिल्ह्यात सारीचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने आपली कंबर कसली आहे. वाशीम समोर आता नवीन संकट ठाकल्याने जिल्हावासीय पुरते चिंतेत पडले आहेत. ज्या पाच रुग्णांना सारीचा प्रादुर्भाव झालाय त्यातील चौघेजण हे उपचारानंतर सुखरूप घरी गेले आहेत.
सारी हा आजार कोरोनाशी साधर्म्य साधणारा आहे. कोरोनासदृश रुग्णांनामध्ये जी लक्षणे आढळतात त्या सारखीच लक्षणे सारी या आजारात आढळून येतात. वाशीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश अहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीव्र ताप, खोकला अशी कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या आणि सरळ – सरळ श्वसन संस्थेवर हल्ला करणारा लक्षणांचा समूह म्हणजेच सारी आजार होय. सारीचे पाच रुग्ण वाशीम जिल्ह्यात आढळले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यांचीही ‘एच1- एन1’ आणि ‘कोविड19’ ची चाचणी करण्यात आली. पण, त्यांना ‘एच1- एन1’ अथवा ‘कोविड19’ चा संसर्ग आढळला नाही. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.
तसेच वाशीम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सारी’ आजाराची लक्षणे आढळलेले रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात असून, त्याचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी आहे . तसेच ‘सारी’ सदृश्य रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून २९ एप्रिल रोजी तीन रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. . यामध्ये एक महिला ही कामरगाव येथील आहे. दुसरी महिला ही कोरोना बाधित क्षेत्रातून आलेली गर्भवती महिला आहे. तर तिसरा रुग्ण हा ‘सारी’ सदृश्य आजार असलेला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे.
औरंगाबाद नंतर वाशीम जिल्ह्यात सारी आजाराची एन्ट्री झाल्यामुळे वाशीमकर पक्के काळजीत पडले आहेत.