बहुजननामा ऑनलाईन : अरबी समुद्रात झालेल्या हवामान बदलामुळे आणि आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, ओडिशालगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान 13 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 55 किमी वेगाने वारे वाहतील. याचा परिणाम म्हणून मच्छिमारांनी समुद्रात पाऊल टाकू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हवामानातील बदलामुळे राज्यात पुढील आठवड्यात मान्सून सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे की कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानातील बदलांमुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास या वर्षी उशिराने सुरू होईल. राजस्थानातून दरवर्षी 15 सप्टेंबरच्या सुमारास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करतो. परंतु यावर्षी 15 दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान शनिवारी दुपारी, सायंकाळी आणि रात्री मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासांत कोकण, गोवा येथे जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली.
जाणून घ्या हवामानाचा अंदाज
13 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा राहील. विदर्भासह लगतच्या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता.
14 सप्टेंबर: राज्यभर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
15 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता.
16 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता.