मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला महाविकास आघाडी सरकारने न्याय द्यावा. मराठा समाजाचे आंदोलन ‘मातोश्री’वर कसे घेऊन जायचे हे आम्हाला माहित आहे. ते तुम्ही आमच्या मराठ्यांवर सोडा, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल सकाळी आझाद मैदानावर आंदोलकांना भेट देत त्यांच्यासोबत चर्चा केली. तसेच याप्रकरणी मंत्रालयात दुपारी सामंत प्रशासन विभागाबरोबर बैठक लावू, असे आश्वासनही दिले. सोमवारी या आंदोलनाचा सातवा दिवस होता.
सकल मराठा समाज पुरस्कृत एसईबीसी व ईएसबीसी उमेदवारांनी २८ जानेवारी २०२० पासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरु केले असून मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच २०१४ च्या भरतीप्रक्रियेमधील उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, असेही त्यांचे म्हणणे आहे. हे आंदोलन गेले सहा दिवस सुरु असून राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. म्हणून रविवारी आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. तर आमदार नितेश राणे यांनी सोमवारी आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली.
दरम्यान ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात आला असून त्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारचे काम आहे. त्यामुळे बैठकीत काय निर्णय होतो ते पहिल्यांदा पाहूया. त्यानंतरच पुढील निर्णय घेऊया. तसेच सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाबद्दल सरकारी अधिकारी कसा दुजाभाव करतात, हे सांगितले. तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने गेल्या पाच वर्षात आश्वासनांशिवाय काहीही दिलेले नाही, असा आरोपही केला आहे.