सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – विनायक काळे यांचा मृत्यू पोलीसांच्या चकमकीत झाल्याचा भासविले जात आहे. या प्रकरणातील घटनाक्रम पाहता घेता चकमक बनावट असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाची योग्य चौकशी होणे आवश्यक असल्याने न्यायालयाच्या देखरेखखाली एसआयटीद्वारे तपास करण्याची मागणी भटक्या, विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी बालकृष्ण रेणके यांनी पत्रकार परिषदेत केली.
उळे येथे पालीसांनी केलेल्या कारवाईत विनायक काळे या युवकाचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या व विनायकच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीमध्ये विसंगती आहे. पोलीसांनी विनायकला चोर, दरोडेखोर, आक्रमक गुन्हेगार असे म्हटले आहे. विनायकच्या संपुर्ण जीवनात त्याच्यावर चोरीचा किंवा इतर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप किंवा तक्रार नाही. तो एक मेहनती आणि बहिण -भावडांना उच्चशिक्षित करण्याचा ध्यास घेतलेला युवक होता. कोयते, तलवारीने आक्रमण करणाऱ्यांवर स्वसंरक्षणार्थ पोलीसांनी गोळीबार केला. त्यात एक इसम मृत्युमुखी पडला आणि बाकीचे पळून गेले, असे पोलीसांचे म्हणणे आहे.
बंदुकीची गोळी लागून विनायक जखमी झाला किंवा मेला, तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जबर मारहाणीचे वण कसे आले, असा सवाल त्यांनी केला. या घटनेच्या पुर्वीच्या आठवड्यात संबंधित पोलीस अधिकारी त्याच्या घरी जाऊन ३० हजार रुपयांची मागणी केली होती, याची माहिती कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तेव्हा विनायक पोलीसांसाठी अज्ञात कसा असू शकेल, असा सवाल रेणके यांनी उपस्थित केला. विनायकच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी दोन शिक्षित मुलींना सरकारी नोकरीत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेस विश्वनाथ काळे, राजेश काळे, राजश्री चव्हाण, भानुदास काळे, ॲड. राहूल जाधव आदी उपस्थित होते.