बहुजननामा ऑनलाइन टीम – मकर संक्रातीनिमित्त युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावतीमध्ये आयोजित केलेला पतंग महोत्सव यंदा बहारदार ठरला तो अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी घेतलेल्या खास उखाण्यामुळे(MP Navneet Rana). ‘शंकराच्या पिडींवर संत्र्यांची फोड, रवींचं बोलणं साखरेपेक्षा गोड’ असा उखाणा खा. राणा यांनी घेतल्यानंतर महिलांच्या टाळ्यांचा एकच आवाज झाला. याच महोत्सवात खा. राणा यांनी संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या
युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते महोत्सवात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघांनीही पतंग बाजी केली. महोत्सवात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. महोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारने सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी पतंगावर स्लोगन लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर त्यांनी हा खास उखाणा घेऊन महोत्सव अधिकच बहारदार बनवला.
खा. राणा यांनी गेल्या अनेक महिन्यात वारंवार ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीवरून त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी लोकसभेत केली होती. कोरोना काळात खाजगी रुग्णालयात रुग्णांची लाखों रुपयांनी लूट होत आहे. ही लूट थांबविण्यासाठी आकस्मिक कायदा लागू करावा, विदर्भात ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागले आहे, अशी माहिती देत खा. राणा यांनी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.