बहुजननामा ऑनलाइन टीम – तामिळनाडूतील जनतेला स्वतःची मन की बात जनतेवर थोपवणारे सरकार नको आहे, तर लोकांच्या समस्या सोडविणारे सरकार हवे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Nagpur’s Nikarwale)राजकारणाने भारताचे अधःपतन होत आहे, हे आता आपल्याला थांबवायला हवे. मोदींना भारताचा पायाच नष्ट करायचा आहे. आपण सर्वजण मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढा देऊ, असे आवाहन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामीळ जनतेला केले आहे.
येत्या मे महिन्यात तामिळनाडू विधानसभेच्या निवडणूका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. धारमपुर येथील एका सभेत गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गांधी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर असून, विविध ठिकाणी रोड शो व सभांद्वारे ते भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत.
राहुल गांधी म्हणाले, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताचा पाया नष्ट करू देणार नाही. त्यांना हे समजत नाही की तामिळनाडूच भविष्य केवळ तामीळ जनताच ठरवू शकते. नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. तसेच मी इथं तुम्हाला हे सांगायला आलो नाही की, तुम्हाला काय करायच आहे. मी तुमच्याशी मन की बात करायला आलो नाही. मी इथे तुम्हाला ऐकण्यासाठी आलो आहे. तुमच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी आल्याचे गांधी यांनी सांगितले.