बहुजननामा ऑनलाइन टीम – अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयानंतर टीम इंडियाचे जोरदार कौतुक होत आहे.
9 बाद 36 अशी अवस्था झाल्यानंतर टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) आणि शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यांनी देखील टीम इंडियाच्या कौतुकाचे ट्विट केली आहे. भारताची अश्विसनीय कामगिरी. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत्या संख्येमुळे एकामागून एक धक्के बसल्यानंतरही भारताने कमबॅक केले आणि विस्मयकारक मालिका विजय मिळवला. भारतीय संघाचे अभिनंदन. दीर्घकाळ हा मालिका विजय लक्षात राहिल असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले आहे.
मेलबर्न कसोटीतील अजिंक्य रहाणेचं शतकं, हनुमा विहारी-आर अश्विन यांची संयमी खेळी, शार्दूल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर यांची अष्टपैलू कामगिरी, मोहम्मद सिराज, टी नटराजन यांची छाप, रिषभ पंतची फटकेबाजी अन् चेतेश्वर पुजारा नावाची अभेद्य भींत. या सर्वांच्या जोरावर टीम इंडियाने 0-1 अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना चार सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. 1988 नंतर गॅबावर ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभूत करून टीम इंडियानने इतिहास रचला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाचे आता आफ्रिदी व अख्तर यांनी कौतुक केले आहे. गॅबावर टीम इंडियानने 328 धावांचे लक्ष्य 3 विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलने 91 धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळीने टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. रिषभ पंतने नाबाद 89 धावा करून विजयी कळस चढवला.
अॅडलेडवरील भारताच्या लाजीरवाण्या कामगिरीचे सोशल मीडियावर सर्वच वाभाडे काढत होते. त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही उडी मारली होती. त्याने केलेले ट्विट तुफान व्हायरल झाले होते. त्याने ट्विट केले होते की, ‘मी उठलो तेव्हा मला स्कोअर 369 असा दिसला, त्यावर मला विश्वास बसला नाही. मी डोळे धुतले आणि पाहिल तर काय, स्कोअर 36/ 9 असा आहे. त्यावरही विश्वास न बसल्याने मी पुन्हा झोपी गेलो अशी टीका केली होती.