वाशीम : बहुजननामा ऑनलाईन – उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर बऱ्याच नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून वाद चालू असताना शिवसेनेतही आता काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. वाशिममध्ये पाच वेळा निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केली असून विदर्भात शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. नाराज झालेल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ठाकरे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मंत्रिपदासाठी जे इच्छुक होते त्यांच्या वाट्याला मंत्रिपद आले नाही, म्हणून काहीजण नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी भावना गवळी यांना तिकीट मिळू नये, म्हणून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बरेच प्रयत्न केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी गवळी यांना तिकीट दिले व त्या निवडूनही आल्या.
विदर्भातून एकाला तरी मंत्रिपद मिळावे, अशी मागणी भावना गवळी यांनी ठाकरे यांना केली होती. तसेच बुलडाण्यातील शिवसेनेचे नेते संजय रामूलकर आणि अकोल्यातील संदीप बाजोरिया यांना मंत्रिपद द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली होती. पण दिग्रसचे आमदार संजय राठोड यांना ठाकरे यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यासोबतच बढतीही दिली. तसेच राज्यमंत्रिमंडळातून कॅबिनेट पदही दिल्यामुळे गवळी नाराज झाल्या आहेत.
Visit : bahujannama.com