मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील आता जुन्या वृक्षांना संरक्षण मिळणार असून, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते ‘हेरिटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. तसेच राज्यात कमी वेळेत ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला.
यावेळी वनमंत्री संजय राठोड, ‘सह्याद्री देवराई’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिने अभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्राधान सचिव मिलींद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या हिरकमहोत्सवा निमित्त राज्यात 75 विशेष रोपवाटीकांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार आहे. शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या मदतीने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालनाही देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.