मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद निर्माण झाला आहे. वीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तर हा प्रस्ताव फेटाळला म्हणून भाजप आमदार नाराज झाले असताना त्यांनी अधिवेशनात गोंधळ घातला असून सरकारच्या निषेधात घोषणा दिल्या आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, काँग्रेसच्या मासिकात वीर सावरकरांबद्दल अपमानास्पद शब्द वापरण्यात आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शिदोरी मासिकावरही बंदी घालावी. तसेच आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा, अशी मागणी केली होती.
यावेळी भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असताना शिवसेनेने त्यांच्यावरच डाव उलटवला. दरम्यान संसदेचे कामकाज मंत्री अनिल परब यांनी टोला लावत भाजपाने ज्या प्रस्तावाची मागणी केली आहे. त्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो. यावर नितेश राणे यांचे मत घ्या आणि त्यांना प्रस्ताव मांडायला सांगा, असे ते म्हणाले.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारने यापूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहीत स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. ती अजूनही केंद्राने पूर्ण केलेली नाही. केंद्रात भाजपचे सरकार असून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे यासाठी प्रयत्न करावेत. आम्हीही प्रयत्न करतो की, स्वा. सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा, असे पवार म्हणाले आहेत.
यावेळी जयंत पाटील यांनी फडणवीस यांना चिमटा काढत काँग्रेसच्या मासिकात जो उल्लेख केला आहे. त्यातील सावरकरांबद्दल मजकूर वाचून दाखवत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताय, असे त्यांनी म्हटले.
तर भाजपनेही जोरदार टोला लगावला आहे. संपूर्ण राज्यभरात भाजपाकडून वीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी केली जाणार असून शिवसेनेचे सावरकर प्रेम किती खरे आहे, हे आज कळेल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विधानसभेत शिवसेनेने वीर सावरकरांच्या अभिमानाचा प्रस्ताव आणावा अशी मागणी भाजपाने केली, मात्र भाजपा सरकार असताना सावरकर यांच्याबद्दल प्रस्ताव का आणला नाही असं विचारताच आमच्या काळात सावरकरांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत नव्हती. पण शिवसेनेचे सावरकरांवर खरेच प्रेम आहे की, फक्त सन्मानाच्या नावाखाली ढोंग करतेय हे जनतेसमोर येईल, असे भाजपने म्हटले आहे.