मुंबई बहुजननामा ऑनलाईन – तळागाळातील लोकांना एकत्र करून सुरु केलेली बहुजन आघाडी पंढरपुरातून धनगर समाजाने सुरू केली. वंचित बहुजन आघाडीमध्ये केवळ दलित लोक आहेत हे म्हणणे चुकीचे आहे असे मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीआधी तळागाळातील वंचित आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली . गेल्या ७० वर्षामध्ये प्रस्थापित पक्षांनी दलित, मुस्लीम, धनगर, बहुजनांच्या अधिकारांसाठी, हक्कांसाठी योग्य प्रयत्न केले नाहीत. आज वंचित आघाडीला मिळणारा भरघोस पाठिंबा, हे त्याचंच द्योतक असून वंचित आघाडी ही एक जातीची आहे असे म्हणणे चुकीचे आहे. असे सुजात आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान ,आजपर्यंत काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगर समाजाला केवळ आरक्षणाचे अमिष दाखविले आणि त्यांच्या मताचे राजकारण केले. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारनेही मागील साडेचार वर्षात तेच केले, असा आरोप वारंवार धनगर समाजच्या नेत्यांकडून करण्यात येतो .धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण डॉ. बाबासाहेबांनीच दिले आहे. परंतु राजकिय मंडळींनी ते मिळू दिले नाही, मात्र आता धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढा देणार आहोत, असेही सुजात आंबेडकर म्हणाले .