अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – येत्या विधानसभेत 25 मुस्लिमांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या समाज प्रोबधन मेळाव्यात ते बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हे मतदारसंघ कोणते असतील हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात दाखवलेले धाडस आता दाखवले पाहिजे. समाजाने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. त्यामुळे माणूस गुलाम होतो. एमआयएम आणि आमच्यातील युती जरी संपुष्टात आली असली तरी येत्या विधानसभेत आम्ही 25 मुस्लिमांना उमेदवारी देणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचितांना मते दिली नव्हती. वंचितची मते मात्र एमआयएमच्या उमेदवाराला पडली होती.” दरम्यान सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत महाआघाडीत सामील व्हावे यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अद्याप मात्र यावर कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
नुकतीच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून फूट पडली आहे. वंचितमधून बाहेर पडल्यानंतर एमआयएमने विधानसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. यात तीन जागांचा समावेश आहे. उमेदवार जाहीर करून एमआयएमने इतर पक्षांना चांगलाच धक्का दिला. एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरीमधून डॅनियल लांडगे नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला, तर मालेगाव येथून मुफ्ती मोहंमद इस्माईल याना उमेदवारी दिली आहे.