मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याचा नारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. काँग्रेस असो की इतर कोणताही पक्ष आमची कोणत्याही पक्षाशी बोलणी झालेली नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मुंबईतील एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येत्या ३० जुलै रोजी वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव हा ईव्हीएममुळे झाला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात ईव्हीएम विरोधात आपण कोर्टात जाणार आहे. वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम आहे असे म्हणणाऱ्यांनी पुरावे द्यावेत अन्यथा माफी मागावी.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितने महाराष्ट्रातील सर्वच्या -सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र औरंगाबादचा अपवाद वगळता त्यांना कुठेही यश मिळाले नाही. असे असले तरीही येत्या विधानसभेला २८८ लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.