मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायदा या दोन्ही कायद्यांविरोधात देशात निदर्शने चालू आहेत. काही राज्यांनी तर हे कायदे लागू करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे. त्यांचा हा बंद एनआरसी, सीएए आणि देशातील अर्थव्यवस्थेविरोधात असून २४ जानेवारीला होणार आहे.
दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. आंबेडकर भवनमधील बैठकीदरम्यान वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या सर्वांनी आंबेडकर यांचं बंदच्या निर्णयाला पाठिंबा देत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
देशात एनआरसी आणि सीएएच्या विरोधात प्रचंड रोष असून सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करत आहे. तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली असून जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरु असून या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र्र बंद पुकारणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
Visit : bahujannama.com