कोल्हापूर बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूकीत अनेक मतदारसंघांत चांगली कामगिरी झाली आहे. त्याचा विधानसभा निवडणूकीत काही ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. परंतु कोणाची तरी मदत घेणे गरजेचे आहे. वंचितला एकट्याने लढून मोठी कामगिरी करता येणार नाही. याची जाणीव दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील लोकांना आहे. त्यामुळे मी एकत्रित निवडणूक लढविण्यास आग्रही आहे. वंचित चर्चेसाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात एखादे नवीन समीकरण तयार झाल्यास त्याचे नवल वाटण्ये काहीच कारण नाही. असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
राज्यात युतीचा फोफावण्यास कॉंग्रेस राष्ट्रवादीची मंडळी जबाबदार आहे. युतीला थोपविण्यासाठी मित्र पक्षांना एकत्र घेतले तर विधानसभेत चांगला फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. समविचारी पक्षांना सोबत घेणे गरजेचे आहे. ही जबाबदारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. तर महाआघाडी होण्यासाठी होत असलेल्या बैठकांमध्ये काही ताळमेळ नाही.
या पक्षांची भूमिका अशीच असेल तर स्वाभिमानी स्वतंत्र लढण्याचा विचार करेल. या दोन्ही घटकांनी एकत्र करून निवडणूक लढण्याची आमची भूमिका आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जय़ंत पाटील आणि कॉंग्रेचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या विषयी गांभिर्याने विचार करतील अशी अपेक्षा आहे. याकडे दूर्लक्ष केले तर आम्हालाही निवडणूक लढविण्यासाठी इतर पर्याय खुले आहेत. असे ते म्हणाले. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.