लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेतात काम करत असताना शेतकर्याला अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच अपंगत्व आले तरी मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल.
शेतकरी कुटुंबातील कुणाचाही शेतात काम करत असताना एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 5 लाख रुपये तसेच शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. 18 ते 70 वर्षांपर्यंतचे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मंत्री आणि प्रवक्ता श्रीकांत शर्मा यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले की, या नव्या योजनेचा लाभ सुमारे 2 कोटी 38 लाख 22 हजार शेतकर्यांना मिळू शकतो.
दुसर्याची जमिन कसणार्या शेतकर्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. राज्याच्या सीमेत काम करणारे शेतकरी, छोटे शेतकरी, मध्यम शेतकरी, आणि मोठी शेती असलेल्या शेतकरी यांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. युपी सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्यांच्या योजनेसह एकुण 13 निर्णय घेण्यात आल्याचे श्रीकांत शर्मा यांनी सांगितले. तसेच 2020-21 साठी नव्या उत्पादन शुल्काच्या धोरणाची घोषणा तसेच नव्या परवाना शुल्काचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार शुल्कामध्ये देशी दारूसाठी 10 टक्के, विदेशी दारूसाठी 20 टक्के आणि बीयरसाठी 15 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे, श्रीकांत शर्मा म्हणाले.
Visit : bahujannama.com