बहुजननामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे दोन साधूंची हत्या करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. ठाकरे यांनी यावेळी साधूंच्या हत्येवरुन चिंता व्यक्त करताना आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. सोबतच आमच्याप्रमाणे तुम्हीही कडक कायदेशीर कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाकरे यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.
ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्राी ठाकरे यांनी केले आहे. उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. गावातील मंदिरात मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास आहे.
दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.