मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात आता CBI ने देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच देशमुख यांच्या घरासह त्यांच्या मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे येथील 10 मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री. @AnilDeshmukhNCP यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला व सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण ४ जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा.उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 24, 2021
उच्च न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग CBI धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करत या प्रकाराचा पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला. त्यांनी CBI च्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. यात चौघांची चौकशी झाली अन् चौघांनीही समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नसल्याचे पाटील म्हणाले.
अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक झाली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.