पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील शिक्षक भरती २०१० पासून बंद आहे. यामुळे हजारो डीएड, बीएडधारक युवक आज नोकरी पासून वंचित आहेत. तब्बल २४ हजार जागांसाठी होणाऱ्या या भरतीला होत असलेल्या विलंबामुळे भावी शिक्षकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरातील उमेदवारांनी ४ फेब्रुवारीपासून पुण्यातील मध्यवर्ती इमारत येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
शिक्षक भरतीच्या आंदोलनामध्ये उपोषणासाठी बसलेल्या उमेदवारांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले असून उमेदवारांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. त्यामुळे राज्य सरकार शिक्षक भरती संदर्भात घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
१) २४ हजारांपेक्षा जास्त जागा भरण्यात याव्यात.
२) आचारसंहितेपूर्वीच नियुक्ती करण्यात यावी.
३) ११ फेब्रुवारीपर्यंत जागांसोबतच भरतीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे.
शिक्षक भरती संदर्भात ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.