अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष राज्यातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर एकत्र आले आहेत. कुठेही आमच्यात मतभेद नाहीत आणि ते असण्याचे कारणही नाही. आता जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने काम करीत असून प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. पण जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडी म्हणूून आम्ही तिघे एकत्र आहोत, असे वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. ‘यूपीएचे नेतृत्व करण्यास सोनिया गांधी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.
अहमदनगरमध्ये ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात शरद पवार यांच्या नेतृत्वाबाबत केलेल्या भाष्याबाबत वडेट्टीवार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘देशात जो पक्ष मोठा असतो, तो नेतृत्व करीत करतो. विरोधकांमध्येही ज्यांचा पक्ष मोठा तो नेतृत्व करतो. देशात सध्या भाजप पक्ष मोठा आहे. त्यामुळे उद्या त्यांचे घटक पक्ष म्हणतील खालच्या लोकांनी नेतृत्व करावे, पण तसे होत नाही. राहिला आमच्या नेतृत्वाचा विषय, तर सोनिया गांधी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत.
आम्ही अनेक राज्यात निवडणूक जिंकलो. पण भाजपच्या कुटील, फोडाफोडीच्या राजकारणामुळे आमच्या हातातून अनेक राज्य गेली आहेत. जे फोडाफोडीचे प्रकार घडत आहेत, ती लोकशाहीसाठी चांगली बाब नाही. लोकशाही पायदळी तुडवून गुलाम बनवण्याचे, हुकूमशाहीकडे नेण्याची ही प्रवृत्ती आहे,’ असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी भाजपवर केला.
… तर ईडीला लोक बीडी सारखे फुकतील! : वडेट्टीवार
‘आता राजकारणात बदला घेण्याची भावना वाढली आहे. पूर्वी मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आता मात्र राजकारणात मनभेद वाढले आहेत . ही प्रवृत्ती वाढत असून हे लोकशाहीला पोषक नाही. सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते. हे भाजपने लक्षात ठेवावे. त्यामुळे भाजप जे पेरत आहे, ते आगामी काळात उगवणार, हे ही लक्षात घ्यावे. केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग कोणाच्या मागे लावण्यासाठी केला जात असेल तर हे योग्य नाही. ही प्रथा भविष्यात सर्वांना अडचणीची आहे. उद्या महाराष्ट्रातील लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील, असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसे प्रकरणावरून भाजपला लगावला.