मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया सामनाच्या संपादीकयमधून दिली आहे. भाजपमध्ये त्यांनी कॉलर उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन ! असे म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलंय सामनाच्या संपादकीय मध्ये ?
भाजपने भागाभागातील सरदार, स्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले व आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन स्वराज्य आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भाजपविषयी भूमिका वेगळी होती व ती टोकाची होती. “कोण मोदी ? आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत” असा त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला होता.
मोदींच्या सरकारने लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिले असा संताप त्यांनी कॉलर उडवत केला होता. आता त्यांनी मन बदलले आहे व मोदी-शहा हे शिवरायांच्या विचाराने कार्य करत असल्याचे विचार मांडले आहेत.
उदयनराजे यांचे ईव्हीएम विषयी देखील वेगळे मत होते.
उदयनराजे यांना जाळ्यात ओढल्याने पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, परंतु शिवराय हे फक्त एकाच जातीचे नव्हे, तर सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे मोहरे म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल.
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त, तत्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्ट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत(शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्राकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल.
येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता धरला व भाजपमध्ये प्रवेश घेताना त्यांनी कॉलर उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन !