बहुजननामा ऑनलाइन टीम : देशात आणि राज्यातील मोदीलाटेमुळे विधानसभा निवडणुकीआधी अनेक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपला जास्त जागा मिळाल्या खऱ्या मात्र सरकार स्थापन करता न आल्याने या आयारामांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण, फडणवीस सरकारने काही भाजप नेत्यांना कारखान्यासाठी दिलेली ३१० कोटींची बँक हमी ठाकरे सरकारने रद्द केली आहे. ज्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, विनय कोरे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि कल्याणराव काळे यांचा समावेश आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा तात्यासाहेब कोरे साखर कारखाना आणि कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना भाजपमधील या चार नेत्यांच्या कारखान्यांना फडणवीस सरकारने बँक हमी आणि भांडवलापोटी मदत दिली होती. मात्र, राज्यावर कर्जाचा बोजा असल्या कारणाने देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेच्या निवडणुकीआधी दिलेली हमी ठाकरे सरकारने रद्द केली आहे.
दरम्यान, मोदी सरकारचा बुलेट ट्रेन प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग प्रकल्प देखील सध्या ठाकरे सरकारच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे सरकारने भाजपने सुरु केलेले कोणतेही प्रकल्प रद्द केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खरंच ज्या प्रकल्पांची आवश्यकता आहे असे प्रकल्प सुरु राहणार असल्याचे ठाकरे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com