अयोध्या : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांच्या काळात आणि त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा बराच गाजला होता. लोकसभा निवडणुकीत भाजप -सेना एकत्र होती. मात्र राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने भाजपला सोडचिट्ठी दिली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. आता मात्र अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोध केला जात आहे. राम भक्तांना धोका दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार
अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही शिवाय त्यांना रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार’.
त्यांनी अयोध्याऐवजी मक्का येथे जायला हवं
तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. महंत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय आहे. त्यामुळे त्यांनी अयोध्याऐवजी मक्का येथे जायला हवं. ते पुढे असंही म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्तानाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेचं गठण केलं होतं. कारण जगात हिंदूचा स्वत:चा कोणताही देश नाही. बाळासाहेबांचं स्वप्न भारताला हिंदूराष्ट्र बनवायचं होतं’.
… त्यांनी बाळासाहेबांचा अपमान केला आहे
परमहंस दास म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की आम्ही शिवसेनेला कधीच काँग्रेस होऊ देणार नाही. गरज पडली तर आम्ही निवडणुकही लढू. मात्र सत्तेचा हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे. त्यामुळे आता त्यांची अयोध्येत काही गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत मी उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करुन रामाचं दर्शन घेऊ देणार नाही’.