मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज अर्ज देखील दाखल केला आहे. यावेळी निवडणूक कार्यालयात आदित्य यांच्यासोबत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि सुनील शिंदे उपस्थित होते. आदित्य यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेनं पदयात्रा काढत, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्वांचे आभारदेखील मानले.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, ‘मी सर्व जनतेना, शिवसैनिकांना, तसेच सुनील शिंदे यांना धन्यवाद देतो. तसेच वरळीतल्या जनतेनं आणि शिवसैनिकांनी आदित्यचा स्वीकार केला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, आजपर्यंत आमच्या घराण्याची जी समाजसेवेची परंपरा होती, ती यापुढेही तशीच राहील यासाठी मी खूप खुश आहे. माझ्यापर्यंत निवडणूक न लढविण्याचा निर्णय आमच्या घराण्याचा, कुटुंबाचा होता. परंतु आता नवीन पिढीचे राज्य असल्याने नवीन पिढीचे विचार देखील वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारानं देश पुढे जावा अशी जनतेची इच्छा आहे, म्ह्णून पुन्हा एकदा मी सर्वाना धन्यवाद देतो. तसेच जे या निवडणुकीत आदित्यला आशीर्वाद देत आहेत, त्यांचा मी ऋणी आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना धन्यवाद दिले.
ठाकरे घराण्यातील पहिली पिढी हि स्वतः निवडणूक लढविणार आहे. त्यात राज ठाकरे यांनी देखील वरळीमध्ये आदित्य यांच्याविरोधात कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे राज आपल्या पक्षाचा कोणताही उमेदवार न उभा करता अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगवली जात आहे. दरम्यान ठाकरे घराण्यातील चौथी पिढी राजकारणात उतरत आहे, मात्र याआधी बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही स्वतः निवडणूक लढविली नव्हती, परंतु संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या एका इशाऱ्यावर चालत असे. तरी आदित्य ठाकरे यांनी अगदी कमी वेळात राजकारणात आपला जम बसवला आहे. आणि आता ते वरळी मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. ठाकरे घराण्यात कितीही मतभेत असले तरी हे कुटुंब नेहमी सुख-दुःखात एकमेकांच्या सोबत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे आताही आदित्य यांना राज ठाकरे अप्रत्यक्षपणे मदत करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
Visit : bahujannama.com