मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघडीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील सरकारच्या अनेक योजना बंद करण्याच्या मागे असल्याचे दिसत आहे. यावरून भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद केली असून या योजनेला मिळणार निधीही बंद करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान होईल, असे अनिल बोंडे हे म्हणाले आहेत. तसेच चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे हे सुडाचे राजकारण करत आहेत, असा आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे.
सोबतच जलयुक्त शिवार योजना ही रोजगार हमी योजनेत टाकली असून पुढील ५ वर्षात होणाऱ्या कामांना २५ वर्षे लागणार आहेत. माजी मुख्यमंत्री यांनी केलेले चांगले काम पुसून टाकायचे असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला.
जलयुक्त शिवार योजना ही देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण योजना असून नव्या सरकारने ही योजना थांबविली आहे. तसेच ३१ डिसेंबरला या योजनेची मुदत संपली असून ठाकरे सरकारने त्या योजनेची मुदत वाढवलेली नाही. तसेच योजनेसाठी एखाद्या अधिकाऱ्याने निधीची तरतूद केल्यास तो गैरव्यवहार केला असे समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आदेशही देण्यात आले आहेत.