बहुजननामा ऑनलाईन टीम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे २९ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जरी ठाकरे यांनी शपथ घेतली तरी ते विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्याचबरोबर आमदार नसताना महाराष्ट्रातील ६ नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. महत्वाचे म्हणजे हे सहा नेते कॉंग्रेसचे होते. त्यामध्ये बॅरिस्टर ए. आर अंतुले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. उद्धव ठाकरेंच्या आधी महाराष्ट्रातील 6 नेत्यांनी आमदार नसताना मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला होता.
ज्यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हा ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे विधिमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यानंतर पुढच्या सहा माहिन्यात ते नेते विधानसभा, विधान परिषदेवर निवडून आले होते. महाआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी आता उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषदेतून निवडून यावे लागेल. यासाठी त्यांच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी आहे. घटनेतील तरतुदीनूसार त्यांना पुढच्या सहा महिन्यात विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागेल, असे राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाच्या पत्रात नमूद केले होते.
राज्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती थेट उतरली होती. उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. आता वडील मुख्यमंत्री आणि मुलगा आमदार असे चित्र ठाकरे पिता पुत्रांच्या रुपाने पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेत पहायला मिळणार आहे.
Visit : bahujannama.com