नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाराष्ट्रातील जेष्ठ नेत्यांसोबत शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातून राज्यसभेत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सोबतच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीसह राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. २ एप्रिलला उदनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भाजप नेत्यांनी दुपारी भेट घेतली होती यावेळी राज्यसभेच्या जागांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. राज्यसभेच्या ७ जागा २ एप्रिल २०२० ला रिक्त होत आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यासाठीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. जे सात सदस्य निवृत्त होणार आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे.
कसे आहे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ
महाराष्ट्रातून एकूण १९ खासदार राज्यसभेवर जातात. दर दोन वर्षांनी ७, ६ आणि ६ अशा जागा रिक्त होतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा ७ जागांसाठी निवड झाली होती तेव्हा ती बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादीकडून शरद पवार, भाजपकडून रामदास आठवले परत राज्यसभेवर येणार यात शंका नाही. महाविकासआघाडीचे संख्याबळाकडे दृष्टीक्षेप टाकला, तर त्यांचे ७ पैकी ४ खासदार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक,काँग्रेसला एक अशी विभागणी त्यामुळे होवू शकते. शिवसेनेच्या मदतीची भरपाई पुढच्या वेळी त्यांना अधिक सीट देऊन केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. आता याहीवेळी ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.