बहुजननामा ऑनलाईन- राज्यात विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या चर्चांना उधाण आलेल आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंगळवारी (ता.१०) भेट घेतली. ही चर्चा साधारण दीड तास चालली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यंमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली असून यामध्ये उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत खलबतं झाली असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र अद्यापही त्याच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालेल नाही. या कारणास्तव उदयनराजेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र उदयनराजेंनी केलेल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांचा भाजप प्रवेश रखडल्याचे चित्र आहे.
दरम्यान, भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये पक्षांतर करायच अजून कोणताच निर्णय झाला नाही,’ अशी माहिती बैठकीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी पक्षांतराचा निर्णय मागे घ्यावा असा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याचीही माहिती आहे. खासदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रितपणे घेण्यासाठी उदयनराजेंनी आग्रहाची मागणी केली आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांची तारांबळ झाली आहे. त्यामुळे उदयनराजे आज रात्रीपर्यंत आपला अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भाजप प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना भविष्यातील आव्हानांची जाणीव करून दिली होती. ते म्हणाले, ‘या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. हादेखील एक पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई करायला नको. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.