Udayanraje Bhosale | कोरटकर, सोलापुरकरच्या ‘त्या’ व्यक्तव्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक, सरकारकडे मोठी मागणी, महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणार्यांच्या…

मुंबई : Udayanraje Bhosale | नागपुर येथील प्रशांत कोरटकर आणि पुण्यातील मराठी अभिनेता राहुल सोलापुरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केली. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात गृहमंत्री फडणवीस हे टाळाटाळ करत असल्याने भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सरकारकडे मोठी मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी ही मागणी केली. यावेळी ते बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात एक विशेष कायदा पास केला पाहिजे. कायदा असा पाहिजे की परत कोणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत बोलण्याचे कोणी धाडस करता कामा नये.
उदयनराजे भोसले म्हणाले, याबाबत अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करा. यामध्ये कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त रुपयांच्या दंडाची तरतूद असावी. अशा घटनांची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्यांकडून झाली पाहिजे, अशीही तरतूद असावी.
तसेच अशा प्रकरणातील दोषारोपपत्र किमान 30 दिवसांत दाखल झाले पाहिजे आणि या गुन्ह्याचा निकाल 6 महिन्यांत लागला पाहिजे, असा कायदा करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.
उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. लोकांना एकत्रित केले आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. बाहेरून होणारे आक्रमण महाराजांनी परतवून लावले. हे कोणाच्या जोरावर? सर्व समाजाच्या जोरावर स्वराज्याला योग्य दिशा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
आपण आज त्यांच्यामुळे मोकळा श्वास घेत आहोत. पण आज काय चालले आहे? आज आपण लोकशाहीत वावरत असताना कोणीही उठतो आणि काहीही वक्तव्य करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, मग म्हणतात की कारवाई केली जाईल. या लोकशाहीत केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी अशी विधाने केली जातात, अशी टीकाही उदयनराजे यांनी फडणवीस सरकारवर केली.
Comments are closed.