कराड : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात चार टप्यात मतदान होणार आहे पैकी दोन टप्यातील मतदान उरकले असून येत्या २३ रोजी तिसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे . त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.ते म्हणाले कि सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बघून घेण्याची भाषा बोलतात. साताऱ्याच्या बाहेरही आयुष्य असते हे त्यांनी विसरू नये.
निवडणुकीत हार-जीतच होत असते. तुम्हाला मतदार बघून घेतील आणि लोळवल्याशिवाय राहणार नाहीत अशी जोरदार टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्यावर केली आहे.पुढे बोलताना ते म्हणाले कि , उदयनराजेंनी आपल्या गादीची शोभा ठेवली पाहिजे. भिडे गुरुजींना वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात, परंतु आम्ही सत्ता परिवर्तन करून भिडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.सातारा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारासाठी कराडमधील जनता व्यासपीठावर रविवारी सकाळी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी सातारा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे, संभाजी मोहिते, प्रा. सुकुमार कांबळे, प्रा. पार्थ पोळके आदी उपस्थित होते.