पुणे : बहुजननामा ऑनलाईन – एका महिला प्रवाशाने कार चालवली असून तिने पुण्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर मुंबईपर्यंत कार चालवली आहे. या महिलेने उबर कॅब बुक केली होती. पण या उबर चालकाला वाटेतच झोप आल्याने या महिलेने बळजबरीने स्टीयरिंग हातात घेत गाडी चालवली. २१ फेब्रुवारीची ही घटना असून, या महिलेचे नाव तेजस्विनी दिव्या नाईक असून तीचे वय २८ वर्षे आहे. तीने आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि विडिओ शेअर केला असताना हा प्रकार समोर आला आहे. तसेच त्यांनी या व्हिडिओमधून उबर कंपनीकडे ड्रॉयव्हरची तक्रार केली आहे. ‘मी पुण्यावरून अंधेरीला जाण्यासाठी उबर कॅब बुक केली होती. सुरुवातीला ड्रायव्हर सतत फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलण्यापासून रोखलं. त्याने फोन ठेवल्यानंतर त्याला झोप येऊ लागली. एकदा तर अपघात होता होता वाचला. मी ड्रायव्हरला सांगितले की, त्याला जर झोपायचे असेल तर मी थोडावेळ गाडी चालवते. आधी त्याने नकार दिला पण नंतर मी स्टिअरिंग ताब्यात घेतले,’ असे तेजस्विनी यांनी सांगितले.
तक्रारीवरून चालक निलंबित, कंपनीनेही मागितली माफी
तेजस्विनी यांनी सांगितले की, “अर्धा तास शिल्लक असताना ड्रायव्हर उठला आणि गाडी चालवू लागला. मी उबरकडे तक्रार केल्यावर मला ईमेल वरून उत्तर मिळाले की, ड्रायव्हरला कंपनीतून निलंबित केले गेले आहे. उबरनेही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत माफी मागितली आहे.” तेजस्विनी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पुरावा म्हणून ड्रायव्हरचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढले होते. तेजस्विनी या एक लेखक असून चित्रपटांसाठी कथा लिहितात.