बहुजननामा ऑनलाईन- अयोध्येत सध्या बाबरी मशीद-राम मंदिर प्रकरणाची सुनावणी दररोज होत आहे. सर्वोच्च न्यायालय देखील लवकरच या प्रकरणाचा निकाल देऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या सर्व प्रकरणात मात्र खटला चालविणाऱ्या वकिलांच्या खर्चाचे श्रेय घेण्यासाठी दोन मुस्लिम संघटना आमनेसामने आल्या आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मौलाना अरशद मदनी यांचे जमीत उलामा-ए-हिंद या त्या दोन संस्था आहेत. या दोन्ही संघटनांमध्ये अयोध्या प्रकरणाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बाबरी मशीद आणि राममंदीर खटल्याचा संपुर्ण खर्च जमीयत उलेमा-ए-हिंद चे मौलाना अरशद मदनी करत असल्याचे बोलले जात आहे. पण हा खटला चालविण्यासाठी मुस्लिम पक्षांचे सर्वात मोठे वकील राजीव धवन या प्रकरणात एक पैसाही आकारत नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. परंतू बाकी वकिलांना धनादेशाद्वारे फी दिली जात असल्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.
दरम्यान, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सय्यद कासिम रसूल इलियास यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यात उर्दू वर्तमानपत्रांद्वारे मौलाना अरशद मदनी आणि त्यांच्या लोकांनी अयोध्या प्रकरणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी ते खूप पैसे खर्चही करत आहेत, असेही या पत्रात म्हटलं आहे. अलीकडेच मदानी यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. दुसर्या दिवशी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मदनी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला मंडळाने मुस्लिम समुदायाला दिला. यावरून हे स्पष्ट होते की जमीयत आणि बोर्डाचे संबंध चांगले नाहीत.
जमीयतचे कायदेशीर सेलचे अध्यक्ष गुलजार आझमी म्हणाले की, जमीयत फोटो स्टेटपासून वकिलांच्या मानधनापर्यंतचा सर्व खर्च करत आहे. इतर कोणतीही संस्था खर्चात सामील नाही. याखेरीज बाबरी खटल्या संदर्भात न्यायालयात प्रथमच जमीयत संघटनाच गेली होती. तर ज्येष्ठ वकील एजाज मकबूल यांची फीही जमीयत भरत आहे. मुस्लिम पर्सनल बोर्ड या प्रकरणात कोठेही नसून बोर्डानेच या प्रकरणाच्या नावाखाली भरीव देणगी जमा केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याच बरोबर वकीलांचे मानधन धनादेशाद्वारे दिले जात असून याचे सर्व रेकॉर्ड असल्याचा दावा बोर्डाने केला आहे. तसेच जमीयतच्या वतीने वकील राजू रामचंद्रन यांना काही आगाऊ फी दिली गेली होती, असे बोर्डाने कबूल केले आहे, पण दुष्यंत दवे, शेखर नफाडे आणि मीनाक्षी अरोरा यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांसह उर्वरित वकीलांना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मानधन दिले आहे.
या प्रकरणात एकूण 14 याचिका दाखल झाल्या आहेत. त्यापैकी हिंदु बाजूने ६ आणि मुस्लिम बाजूने ८ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुस्लिम पक्षांमध्ये केंद्रीय सुन्नी वक्फ बोर्ड, जमीयत उलेमा-ए-हिंद (हमीद मोहम्मद सिद्दीकी), इक्बाल अन्सारी, मौलाना महमूदुर्रहमान, मिसबाहुद्दीन, मौलाना महफुजुर्रहमान मिफ्ताही आणि मौलाना असद रशीदी यांचा समावेश आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या प्रकरणात थेट सामील नाही, तर संपूर्ण प्रकरण बोर्डाच्याच देखरेखीखाली सुरु आहे.