बहुजननामा ऑनलाइन टीम – शेती उताऱ्यासाठी काढलेली नोटीस परत घेण्यासाठी 2 लाखांची लाच (Bribe) घेताना तहसीलदरांसह मंडळाधिकारी व तालाठ्यास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.(anti-corruption scam) महसुल विभागातील तीन मोठे मासे एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.18) दुपारी अडीचच्या सुमारास तहसील कार्यालयात करण्यात आली.
तहसीलदार हेमंत भागवत पाटील (वय -40 रा. भराडी, ता. जामनेर), बोदवड येथील मंडळ अधिकारी संजय झेंडू शेरनाथ (वय-47 रा. भुसावळ) आणि तलाठी नीरज प्रकाश पाटील (वय-24 रा. बोदवड) अशी लाच घेताना अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे 2002 मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेत खरेदी केले. या शेतीचा 7/12 उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले. मात्र, कालांतराने या शेतीच्या उताऱ्यावर परत मूळ मालकाचे नाव आल्याने तक्रारदार यांनी मंडळाधिकारी यांना भेटुन पुन्हा उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला. या उताऱ्याबाबत तहसीलदार, बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली. सदर नोटीस रद्द करण्यासाठी तहसीलदारांच्यवतीने मंडळाधिकारी व सर्कल यांनी अगोदर पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीत दोन लाख देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या प्रकरणी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी अडीचच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचून तिघांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई नाशिकचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक निलेश लोधी यांच्या पथकाने केली.