बहुजननामा ऑनलाईन – बुधवारी मध्यरात्री अमळनेर तालुक्यातील बाह्मणे येथे पावसामुळे मातीची भिंत शेजारील पत्र्याच्या शेडवर पडल्याने दोन चिमुरड्यांचा दबून मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे.पावरा कुटुंबीयावर या घटनेने शोककळा पसरली आहे.
बाह्मणे येथील शेतमजूर पूना सदा पावरा हे पत्नी शांताबाई आणि मुले जितेश व राहुल यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने काल मध्यरात्री दोनच्या सुमारास शेजारील घराची मातीची भिंत त्यांच्या पत्र्याच्या शेडवर कोसळली. यात संपूर्ण कुटुंब दाबले गेले. त्यांचा आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी लगेचच धाव घेतली आणि पूना पावरा आणि शांताबाई पावरा यांना काढण्यात गावकऱ्यांना यश आले.
मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने जितेश आणि राहुल या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. त्यांना बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे सुविधा नसल्याने जखमींना त्वरितच उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तर दोन्ही चिमुरड्यांचे विच्छेदनही ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.