हैदराबाद : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. प्रियंका रेड्डी या तरूणीवर बलात्कार करून तिला निर्घृणपणे जाळून ठार मारणाऱ्या चार आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. मात्र आता या प्रकरणी अतिशय खळबळजनक माहिती समोर आली आहे. चकमकीमध्ये ठार झालेल्या आरोपींपैकी दोघे जण हे अल्पवयीन होते, असा दावा आरोपींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर केला आहे. तसेच या सर्वांना खोट्या चमककीत ठार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या आरोपींपैकी नवीन याच्या आईने सांगितले की, ”नवीन हा माझा एकुलता एक मुलगा होता. त्याला ठार करण्यात आले तेव्हा तो केवळ १७ वर्षांचा होता. त्याचा जन्म २००२ मध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याने शाळा सोडली होती. तो जिथे शिकत होता, त्या चिन्ना पोरमा शाळेतील त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आम्हाला लवकरच मिळेल.”
दरम्यान, या प्रकरणातील अजून एक आरोपी शिवा याचे वडील जे. रंजना यांनी मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडताना चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझा मुलगा हत्यारबंद पोलिसांच्या पहाऱ्यातून कसा काय पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो? त्याला खोट्या चकमकीत मारले गेले. जर माझ्या मुलाने अपराध केलाही असेल तर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या हवाली केले पाहिजे होते.” तसेच रंजना यांनीही आपला मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा केला. अन्य दोन आरोपी असलेल्या चेन्नाकेशवुलू आणि मोहम्मद आरिफ यांच्या वडिलांनीही मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मुलांना खोट्या चकमकीत मारण्यात आल्याची शंका व्यक्त केली.
Visit : bahujannama.com