मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गतवर्षी खरेदी न झालेल्या तूर आणि हरभर्यासाठी शासनाने जाहीर केलेले अनुदान कागदावरच आहे. 50 हजार हरभरा आणि 30 हजार तूर उत्पादक शेतकरी गेल्या आठ महिन्यांपासून अनुदानाची वाट पहात आहेत. खरीप हंगाम 2017-18 मध्ये तूर व हरभर्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी झालेल्या, परंतु नाफेडने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्यावर्षी पाच जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती.
तहसीलदारांच्या माध्यमातून अर्जदार शेतकर्यांच्या पीक पेर्याची छाननी केली असता, पणनने नोव्हेंबर 2018 मध्ये 70 कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले. दरम्यान, राज्य शासनाने अनुदान वितरणासाठी पणन महासंघाला 480 कोटी रुपयांची शासन हमी दिली. त्यानंतर संघाने आणखी 112 कोटी वितरित केले आहेत. अद्यापही सुमारे 50 हजार हरभरा उत्पादक शेतकर्यांना अनुदान मिळालेले नाही. तूर उत्पादकांपैकी 1 लाख 30 हजार शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी सुमारे 99 हजार शेतकर्यांना 112 कोटी रुपये अनुदान वितरित झाले आहे. मात्र, सुमारे तीस हजार शेतकर्यांना अनुदान मिळालेले नाही.