नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्म प्रचार व प्रसाराचे कार्य केले जाते. बौद्ध संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. देशातील वातावरण बिघडले असून जागृत राहून धम्माचे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. बौद्ध उपासकांनी अंगी नम्रता बाळगून त्यागी व्हावे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्म परिषदांचे आयोजन करवे, असे आवाहन पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले. दाभड येथील महाविहार बावरीनगर येथे पू. भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ३२ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. धम्म परिषदेचे उदघाटन झाले त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशात प्रसिद्ध असलेल्या या परिषदेचे उदघाटन पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते झाले. तर धम्म ध्वजारोहण प्रज्ञाज्योती यांच्या हस्ते झाले. धम्म परिषदेनिमित्त काढण्यात येणाऱ्या ‘संबोधी २०१९’ चे प्रकाशन भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी साडेपाच वाजता त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, सकाळी साडेआठ वाजता महाबोधी वंदना, सकाळी साडेनऊ वाजता धम्म ध्वजारोहण पूज्य भदंत प्रज्ञाज्योती यांच्या हस्ते झाले. दुपारी दोन वाजता नांदेड शहरातून महात्मा ज्योतिबा फुले पुतळयापासून बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयापर्यंत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतमेची धम्म मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत पूज्य भिक्खू संघ व नागसेन हायस्कूलच्या मुलींचे लेझिम पथक सहभागी झाले होते.या धम्म परिषदेचे सूत्रसंचलन प्रा. मिलिंद भालेराव यांनी केले. भिक्खू संघाचे स्वागत महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले. या वेळी बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी के. डी. गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.