सातारा : बहुजननामा ऑनलाइन – उंब्रज येथील त्रिवेणी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीचे पूजन करून झाला. त्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीला येथील महात्मा गांधी विद्यालयातून ढोलताशाच्या गजरात सुरूवात झाली. विविध वेशभूषा परिधान केलेले लहान थोरांसह शालेय विद्यार्थी शुभारंभ दिंडीचे आकर्षण ठरले. मुलींचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. नऊवारी साडी, नाकात नथ अशा पारंपारिक वेशात युवतींनी घोड्यावर स्वार होऊन काढण्यात आलेल्या मिरवणुकीने ग्रंथदिंडीची शोभा वाढली.
दिंडी सुरभी चौक मार्गे, चोरे रोड ते बसस्थानक परिसर, माणिक चौक मार्गे, भैरवनाथ मंदिराकडून ग्रामपंचायत कार्यलय मार्गे बाजारपेठेतील साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात दाखल झाली. यावेळी नागरिकांनी दुतर्फा उभे राहून दिंडीचे स्वागत केले. छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध वेश परिधान करून शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सांस्कृतिक दर्शन घडवले. चौकाचौकात रांगोळ्यांच्या पायघड्या, महिलांनी धरलेला फेर, टाळ मृदुंगावरील वारकरी समुदाय, लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेली लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज येथे तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने जल्लोषात प्रारंभ झाला.
साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात माधुरी जाधव यांनी ‘उंब्रजचा इतिहास व महाराणी ताराराणी’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्या युवा पिढीला उंब्रजचा इतिहास काय आहे, याची माहिती मिळाली. त्यामुळे उंब्रजला ऐतिहासिक वारसा असल्याचे या निमित्ताने युवा पिढीला माहीत झाले.