औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – सध्या देशात कोरोनाचा प्रसार वाढत असून त्याचा परिणाम भारतीय उद्योगावर होत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून औरंगाबाद ट्रॅव्हल्स टॅक्सी असोसिएशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी ३१ मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला असून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे निर्णयाने शहरातील जवळपास १५०० गाड्या बंद राहणार आहेत.
बुधवारी औरंगाबाद ट्रॅव्हल्स टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांची बैठक झाली. ही बैठक असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण ढेरे यांच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत कोरोना संशयितांची संख्या वाढत चालली असताना हा रोग थांबवण्यासाठी शासन आपल्या स्तरावर विविध उपाययोजना राबवत आहेत.
अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. ढेरे यांनी दिली. दरम्यान असोसिएशनचे अध्यक्ष आमेर हुसैनी, सचिव अनिल कऱ्हाळे यांच्यासह इतर सदस्यही या बैठकीस उपस्थिती होते.