मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई-पुणे या द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीसाठी निविदा दाखल करण्याची मुदत १० फेब्रुवारी, २०२० रोजी संपली. मंगळवारी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. फेरनिविदा प्रक्रियेत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचीच निविदा आल्याचे तांत्रिक निविदा छाननीत समोर आले. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या टोल वसुलीचे कंत्राट ‘आयआरबी’ला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुलीचे काम ‘आयआरबी’कडे देण्यात आले होते. त्याची मुदत ऑगस्ट, २०१९ साली संपली होती. त्यामुळे निविदा काढल्या. पहिल्या टप्प्यात निविदांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढी दरम्यान ‘आयआरबी’ची एकमेव निविदा आली. दरम्यान, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘सहकार ग्लोबल कंपनी’कडे हंगामी स्वरूपात टोल वसुलीचे काम देण्यात आले आहे.
मूल्यमापन सुरू; अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
निविदा प्रक्रियेमध्ये केवळ आयआरबी या कंपनीचाच निविदा सादर झाल्याने याबाबतचे मूल्यमापन सध्या सुरु आहे. त्यामुळे आम्ही देखील अंतिम निर्णयाची वाट पाहत आहे असे आयआरबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.