मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबई – पुणे एक्सप्रेस वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रवास महागणार आहे. कारण येत्या 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) कंत्राटदार म्हणून नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या या द्रुतगती मार्गाेने प्रवास करणाऱ्या कारला 230 रुपये टोल द्यावा लागतो मात्र 1 एप्रिलपासून 270 रुपये मोजावे लागणार आहेत. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सला टोल वसुलीचे हक्क देण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिले आहे.
टोलचे नवे दर –
मिनी बसचा टोल 355 रुपयांवरुन 420 रुपये करण्यात आला आहे तर ट्रक आणि अवजड वाहनांना 493 रुपयांऐवजी 580 रुपये टोल भरावा लागेल. बस चालकांना 675 रुपयाऐवजी 797 रुपये टोल भरावा लागेल तर क्रेन किंवा मल्टिएक्सेल वाहनांकडून 1165 ते 1555 रुपयांऐवजी 1380 ते 1835 रुपयांपर्यंत टोल आकारण्यात येईल.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स एमएसआरडीसीला 8,262 रुपये देतील, त्यातील 6500 कोटी एकरकमी दिले जातील तर उर्वरित रक्कम हप्त्याने दिली जाईल. त्या बदल्यात आयआरबी पुढील 15 वर्ष टोल वसुली करेल. ऑगस्ट 2004 मध्ये म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चरला टोल वसुलीचे अधिकार होते.
2017 साली मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरील टोल 18 टक्क्यांनी वाढला होता. दर तीन वर्षांनी एक्सप्रेस वे च्या टोलच्या दरात 18 टक्क्यांनी वाढ होईल अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती.
मुंबई – पुणे जोडणारा 93 किमी अंतराचा द्रुतगती महामार्ग हा भारतातील पहिला काँक्रिटयुक्त सहापदरी, हायस्पीड आणि टोल आकारला जाणारा एक्सप्रेस वे आहे. हा द्रुतगती महामार्ग कळंबोलीपासून (मुंबई) देहू रोड (पुणे) पर्यंत आहे.