बहुजननामा ऑनलाइन टीम – दोनशे वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेले आणि गणरायाची नगरी म्हणून ओळख असलेले सांगली शहर जिल्हा बनून आज ६० वर्षे पूर्ण झाली. दक्षिण सातारा जिल्ह्याचे “सांगली’ नामकरण २१ नोव्हेंबर १९६० रोजी झाले होते. शेती, उद्योग, सहकार, कला, क्रीडा, शिक्षण, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात प्रगती करण्याबरोबरच एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे दुष्काळ, अशा टोकाच्या परिस्थितीवर मात करत जिल्ह्याचा विकास रथ पुढे सरकत आहे.
इतिहास अभ्यासक विजय बक्षी सांगतात, कृष्णाकाठावर वसलेली सांगली (Sangli district)ही सहा गल्ल्यांची. ती आज महानगर झाली आहे.
गेल्या साठ वर्षांत या जिल्ह्याने खूप उंची गाठली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, पतंगराव कदम या नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणात सांगलीचे नाव चमकवले.
चांदोली धरणाची निर्मिती, टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे या सिंचन योजनांतून शेतीची प्रगती साधली. रोजगार हमी, स्वच्छता अभियान, पाणी अडवा-पाणी जिरवा यांसारख्या योजनांची निर्मिती केली. आज या योजनांचा स्वीकार राज्याने, देशाने केला आहे.
त्याचबरोबर किर्लोस्कर उद्योग समूह, चितळे दूध, वालचंद महाविद्यालय अशी काही नावे राज्यात ब्रॅंड झाली. सांगलीची हळद, बेदाणा, द्राक्ष तसेच साखर कारखानदारीतील वर्चस्व हे राज्यभरच नव्हे, जगभर लौकिकास पात्र ठरले.
दक्षिण सातारा ते सांगली
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १ ऑगस्ट १९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर दिवशी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा झाले. या जिल्ह्यात १९६५ मध्ये कवठेमहांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले. पुढे पलूस तालुक्याची आणि २००२ रोजी कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली. सध्या ८ हजार ५७८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, दहा तालुके, ३० लाखांवर लोकसंख्या, एक महापालिका, चार नगरपालिका, ७०९ ग्रामपंचायती, दोन लोकसभा, आठ विधानसभा क्षेत्रांचा हा जिल्हा आहे.
उद्योग, व्यवसायांचे जाळे
सांगली जिल्हा हा येथील साखर कारखानदारीमुळे सर्वाधिक परिचित आहे. जिल्ह्यात १८ साखर कारखाने असून, ४ हजार ८३४ सहकारी संस्था, ७ सूतगिरण्या, वाईन पार्क, दूध संघ असे जाळे पसरले.
मिरज रेल्वे जंक्शनचा विकास या साठ वर्षांतील महत्त्वाचा भाग. देशाला जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचे जाळे येथे विणले गेले आहे. अलीकडे जिल्ह्यातून चार नवे राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. संपूर्ण जिल्हा आता महामार्गाशी जोडला जातोय. लोकचळवळीतील विकास मार्गाचा त्यानिमित्ताने गौरव झाला. सांगली जिल्हा साठीचा होत असताना हा गौरव अधिक महत्त्वाचा ठरतो.
क्रांतिकारकांपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांची कर्मभूमी
सांगलीत विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले. औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड हे सांगलीचे. महान कलावंत बालगंधर्व यांची कर्मभूमी सांगली जिल्हाच. कर्मवीर भाऊराव पाटील हे सांगलीचेच. बॅ. पी. जी. पाटील, ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे, कथाकार चारुता सागर, क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर अशी कित्येक दिग्गज माणसं या सांगलीने दिली आहेत.
ऐतिहासिक महत्त्व
पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी शिराळ्यामध्ये शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध पावला.सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला आहे. दरम्यान,मिरज येथील तंतुवाद्ये प्रसिद्ध असून, येथील वाद्ये जगभर पाठविली जातात.