नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज ( १ फेब्रुवारी ) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना सादर केलेल्या या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून हा अर्थसंकल्प म्हणजे एक जुमलाच आहे, असा टोला काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान “आजचा अर्थसंकल्प केवळ आगामी निवडणुका डोळ्यासममोर ठेवून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत जेवढे अर्थसंकल्प सादर करण्यात आले, त्याचा सर्वसामान्यांना काहीच लाभ झालेला नाही. हा अर्थसंकल्प देखील जुमलाच आहे. त्यांच्याजवळ फक्त चार महिने आहेत, मग ते कधी योजना लागू करणार ? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारने शेतकऱ्यांसदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत “पाच एकरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार जमा होणार आहेत. वर्षाला ६ हजार म्हणजे पर महिन्याला ५०० रू मिळणार. महिन्याला ५०० रूपयात शेतकरी सन्मानाने कसा जगु शकतो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.