नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकार देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. 2021 पर्यंत देशात डिजिटल व्यवहारांमध्ये चारपट वाढ होण्याची शक्यता आहे. सुरक्षित बँकिंग सुविधा देण्यासाठी भारतीय बँकांनी अनेक पावले उचलली आहेत. बँका वेळोवेळी फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी निर्देश जारी करत आहेत. परंतु, तरीसुद्धा फसवणूक करणारे बँक खात्यातून पैसे काढत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (एसबीआय) जयपुरच्या महाप्रबंधकांनी ग्राहकांना ईमेल करून याबाबत अलर्ट जारी केला आहे.
भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे की, फोन, एसएमएस, ईमेल, सोशल मीडियाद्वारे पुरस्कार, लॉटरी, गिफ्ट, नोकरी, स्वस्त वस्तू देण्याच्या अमिषाला कधीही बळी पडू नका. आपल्या बँक खात्याची माहिती जसे की, खाते क्रमांक, आयएनबी आणि एटीएम कार्ड कुणालाही देऊ नका. त्याचा गैरवापर होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्यावरही कायदेशिर कारवाई होऊ शकते. बँक किंवा कोणीही प्रतिनिधी, ग्राहकांची व्यक्तीगत माहिती जसे की एटीएम पिन, इंटरनेट पासवर्ड, वन टाईम पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांक विचारण्यासाठी कधीही ई-मेल, एसएमएस, फोनचा वापर करत नाहीत.
तुम्ही गुन्हेगाराला पकडण्यासाठी अशा प्रकारची माहिती ताबडतोब स्थानिक पोलिसांना देऊ शकता आणि जवळच्या एसबीआय शाखेलाही कळवू शकता. शाखेत संपर्क साधण्यासाठी गुगल सर्च इंजिनवर उपलब्ध संपर्क नंबर आणि माहितीवर विश्वास ठेऊ नका. यासाठी आमच्या एसबीआय वेबसाइटचाच उपयोग करा. तुमचा पिन आणि पासवर्ड गुप्त ठेवा. वेळोवेळी बँकेशी संबंधित पासवर्ड बदलत रहा. फ्रॉड केवळ ऑनलाइन ट्रांजेक्शनद्वारेच नव्हे, तर एटीएम, डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेही होतात. यासाठी ग्राहकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
Visit : bahujannama.com