अंबरनाथ: बहुजननामा ऑनलाईन – साफसफाई करण्यासाठी केमिकलच्या भुयारी टाकीत उतरलेल्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. अंबरनाथ एमआयडीसीमधील वडोलगाव येथील केमिकल कंपनीत शनिवारी (दि. 27) ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलामार्फत कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतील केमिकल साठविणा-या भुयारी टाकीची साफसफाई करण्यासाठी तसेच टाकीला कलर लावण्यासाठी 3 कामगारांना बोलावण्यात आले होते. ठेकेदराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने न देता टाकीत साफ सफाईसाठी खाली उतरवले होते. टाकीत काम करताना अचानक कामगारांना त्रास होऊ लागला. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना बाहेर पडता आले नाही. तसेच त्यांना वेळीच मदत मिळाली नाही. त्यामुळे तिन्ही कामगारांचा टाकीतच गुदमरून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.