मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्राकडून ओबीसी आरक्षणाबाबत न्या. रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींचे तीन तुकडे करणं हे अतिशय घातक असल्याचा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. मुंबई येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे .ओबीसी आरक्षणाचा ओबीसींतील काही घटकांनाच लाभ होतो असे कारण देत सरकारने न्या. रोहिणी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा आयोग नेमून ओबीसींचे तीन भाग करण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. सध्या ओबीसी आरक्षणात २ हजार ६२३ जाती आहेत. त्यातील ९८३ जातींना लाभ मिळत नसल्याचा निष्कर्ष काढला. त्यामुळे ज्यांना लाभ मिळत नाही त्यांना १० टक्के, अंशतः लाभ मिळणाऱ्यांना १० टक्के व सर्वाधिक लाभ मिळणाऱ्यांना ७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जात असून ओबीसीतील केवळ १० जातींना २५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे निष्कर्ष काढला जात आहे असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, समाजातील वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी समता परिषदेची स्थापना करण्यात आली होती. गेली २७ वर्षापासून समता परिषद काम करत आहे. परिषदेच्या माध्यमातून आरक्षण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासह अनेक कामे झाली. सध्याच्या काळात समाजामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेची ज्योत तेवत ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.